कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक:–
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. महायुती म्हणून राज्यातील बहुतांश महापालिका निवडणुका एकत्र लढवल्या जाणार असल्या, तरी कल्याण-डोंबिवलीबाबत भाजपने वेगळा विचार केल्याचे संकेत मिळत आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी जाहीर केले होते की, मुंबईसह राज्यातील बहुतेक महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना महायुती निवडणूक लढवेल. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत युती नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर केडीएमसी (KDMC) निवडणुकीत भाजप स्वबळावर उतरण्याची शक्यता अधिक बळावली आहे.
रविंद्र चव्हाण यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेबाबत केलेले विधान हे विचारपूर्वक असल्याचे स्पष्ट केले आहे. “या वक्तव्याचा अर्थ काय काढायचा, हा तुमचा प्रश्न आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा इशारा दिला. त्यांनी कार्यकर्त्यांचा उल्लेख करत सांगितले की, हजारो इच्छुकांपैकी केवळ मर्यादित उमेदवारांनाच संधी मिळणार आहे, यामुळे स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
तसेच, त्यांनी कार्यकर्ते आणि मतदारांना थेट आवाहन करत सांगितले की, कमळ चिन्हावर उभा असलेला उमेदवार निवडून दिल्यास विकासकामे अधिक वेगाने मार्गी लागू शकतात. केंद्र आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने महापालिकेतही भाजपची सत्ता आल्यास अनेक प्रश्न सोडवणे सोपे जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. ठाणे जिल्ह्यातील या नगरपरिषदांमध्ये भाजपने सत्ता मिळवली, तर शिवसेनेला पराभव स्वीकारावा लागला. हा निकाल शिंदे गटासाठी धक्कादायक मानला जात असून, याच पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवलीत भाजप स्वबळावर उतरण्याची शक्यता अधिक चर्चेत आली आहे.
एकूणच, रविंद्र चव्हाण यांच्या वक्तव्यांमुळे केडीएमसी निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार का, याबाबत तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. आगामी काळात भाजपची अधिकृत भूमिका स्पष्ट होणार असली, तरी सध्या तरी कल्याण-डोंबिवलीच्या राजकारणात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा:– जेजुरीत विजयानंतर जल्लोषाला गालबोट; भंडाऱ्याच्या उधळणीत आग, 16 जण जखमी














