सिंदेवाही / सावली (चंद्रपूर):
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आणि सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यामुळे दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
सिंदेवाही तालुक्यातील गंजेवाही परिसरात पहिली घटना घडली. येथील अरुणा ऊर्फ छाया अरुण राऊत (वय ४९, रा. सिंदेवाही) या शनिवारी (ता. १३) संध्याकाळच्या सुमारास शेताजवळील परिसरात तुरी पाहण्यासाठी गेल्या होत्या. याच वेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. त्या बराच वेळ घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता, जंगलालगतच्या नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून पुढील कारवाई करण्यात आली. वनविभागाकडून मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
दरम्यान, दुसरी घटना सावली वनपरिक्षेत्रात घडली. मूल तालुक्यातील बेलघाटा येथील पितांबर गुलाब सोयाम (वय ३६) हे शनिवारी जनावरे चराईसाठी जंगलात गेले होते. सावली वनपरिक्षेत्रातील एका कंपार्टमेंट परिसरात वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले.
रात्री जनावरे गावात परतली मात्र पितांबर सोयाम परतले नाहीत. याची माहिती वनविभागाला देण्यात आल्यानंतर रविवारी सकाळी शोधमोहीम राबवण्यात आली. त्यावेळी जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला.
सलग दोन घटनांमुळे सिंदेवाही आणि सावली परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.














